खामगाव (प्रखर प्रहार न्यूज): शहरातील नागरिकांची मोठी समस्या असलेला रेल्वे गेटचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार असल्याचे स्वप्न त्या भागातील नागरिकांना राजकीय मंडळींनी दाखवून आपला उल्लू सरळ केला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
विधानसभेच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ना. गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याने सदर काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. त्याप्रमाणे सदर कामाला सुरुवातही तात्काळ झाली. एका वर्षात सदर काम पूर्ण होईल, असे वाटत होते. परंतु ज्या जोमाने कामाला सुरुवात झाली, ती काहीच दिवसांत मंदावत गेली. नगर परिषदेच्या हद्दीत काम पूर्णत्वास आल्यानंतर जेव्हा रेल्वेच्या जागेत काम करण्याची वेळ आली, त्यावेळी मात्र कामाला मोठ्या प्रमाणात ब्रेक लागला.
वाशिम बाजारात सोयाबीनचा भाव ८००० च्या वर; एवढा भाव कसा मिळाला?
अनेकांना त्यावेळी काम कोणत्या कारणास्तव संथगतीने सुरू आहे, हे न उलगडणारे कोडे होते. तरीही काही राजकीय मंडळींनी नागरिकांना भुलथापा देऊन सदर काम लवकरच पूर्ण होईल, अशा भूलथापा देऊन नागरिकांची दिशाभूल करणे सुरू केले. काही काळानंतर मात्र कामावरील साधनसामग्री हळूहळू कमी होताना आणि कामावरील मजूरही आपापले घरटे (तीनशेड) सोडून जाताना दिसत होते. त्यामुळे सदर काम बंद पडल्याचे सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आले. खरोखरच ज्या ठिकाणी कामाची वरदळ आणि मशीनचा गोंगाट होत होता, त्या ठिकाणी कमालीची शांतता नागरिकांना सत्य आणि वास्तव सांगत होती. अखेर सदर कामाचा ठेकेदार आणि त्यांची कंपनी काम सोडून गेल्याची सत्य बातमी वाऱ्यासारखी पसरली. आता अर्धवट झालेल्या कामामुळे बाजूला असलेल्या व्यापारी संकुलातील व्यावसायिकांना आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाची काळजी झोपू देत नव्हती. त्यामुळे सदर कामाचा ठेका घेतलेल्या स्थानिक ठेकेदाराच्या कानावर वारंवार बातम्या गेल्याने सदर कामाचे बिंग फुटणार की काय, अशी भीती ज्यांनी कामाची सुरुवात करताना छाती ठोकून ‘आम्हीच काम आणले, आमच्याशिवाय गावाचा विकास कुणी करू शकत नाही’ अशा थापा मारणाऱ्या काही राजकीय मंडळींना आता मात्र काहीच सुचत नव्हते.
अशातच भाजपचे माजी नगर परिषद उपाध्यक्ष महेंद्र रोहणकर यांनी सदर काम पूर्ववत करण्यासाठी आमरण उपोषण सुरू केल्याने नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. ज्यांनी कामाला सुरुवात केली, त्यांचीच ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सत्ता असताना जर हीच मंडळी उपोषणाला बसत असतील, तर नेमके चुकले कुणाचे आणि दोषी कोण?, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला होता. त्यातच कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांच्या मध्यस्थीने रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर काम त्वरित पूर्ण करू, असे लेखी आश्वासन दिल्याने सदर उपोषणाची सांगता करण्यात आली.
आज उपोषण सोडून जवळपास एक महिना झाला, तरी सदर कामाला सुरुवात झाली नाही. इतकेच काय, तर सदर कामावरील मजूरही बोलाविण्यात आले नाहीत. यावरून सदर उपोषण नेमके कशासाठी करण्यात आले होते, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे. वास्तविक पाहता महेंद्र रोहणकर हे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांचे फार जवळचे नातेवाईक असून, त्यांना सदर कामासाठी उपोषणाला बसण्याची गरजच नव्हती. सदर ठेकेदार जर नियमाने काम करत नसेल, तर त्याला काळ्या यादीत टाकणे हा सरळ उपाय होता. इतकेच काय, तर भाजपची सत्ता केंद्रातही आहे, त्यामुळे या कामाच्या ठेकेदाराला वरीष्ठ स्तरावरूनही काळ्या यादीत टाकता आले असते. परंतु असे न करता उपोषणाचा मार्ग पत्करून सत्य दडपण्याचा प्रयत्न तर केला गेला नाही ना, अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.
सदर कामासाठी आणि भुयारी मार्गासाठी लागत असलेली लांबी नियमानुसार भरत नसल्याने केंद्रीय रेल्वे विभागाने परवानगी नाकारली का, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. जर सदर काम नियमात बसत नव्हते, तर कामाला सुरुवात करण्याची काय गरज? सदर रेल्वे गेट बंद झाल्यामुळे अनेक व्यावसायिकांचे संसार उघड्यावर आले असल्याचे वास्तव मान्य करावेच लागेल. नियमात बसत नसताना कामाला सुरुवात करताना किमान या व्यावसायिकांचा तरी विचार व्हायला पाहिजे होता. परंतु राजकीय मंडळींनी कुणाचाही विचार न करता सदर कामाला सुरुवात केली आणि आज जवळपास आठ महिन्यांपासून काम पूर्णपणे बंद असल्याने बाधित झालेल्या नागरिकांना पुढे काय होईल, या चिंतेने ग्रासले आहे. निदान उपोषणकर्त्यांनी तरी सदर कामाच्या जैसेथे किंवा पूर्णत्वास कसे जाईल, याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. त्यामुळे रेल्वे भुयारी मार्गाचे वास्तव अद्याप तरी गुलदस्त्यात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.











2 thoughts on “काम बंद पडलेला भुयारी मार्ग, आंदोलन/उपोषण आणि वास्तव!”