कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो आदिवासी विद्यार्थी राज सुनील चव्हाण. नवोदय विद्यालयात निवड झालेल्या या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार केवळ पुष्पगुच्छ देऊन संपवण्यात आला नाही. ट्रस्टतर्फे त्याला पुढील शिक्षणासाठी १० हजार रुपयांचा धनादेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांची भेट देऊन प्रोत्साहन देण्यात आले. या मदतीमुळे राजच्या शिक्षणाच्या प्रवासाला बळ मिळणार आहे, असे उपस्थितांनी सांगितले.
बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मंत्राला अनुसरून कार्यक्रमात शेकडो महिलांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच, पत्रकारितेतील बाबासाहेबांच्या योगदानाची आठवण करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ खंड २० – पत्रकारिता’ हा विशेष ग्रंथ उपस्थित पत्रकारांना भेट देण्यात आला. कडक उन्हात नागरिकांची सोय व्हावी म्हणून पाणी वाटपाचाही उपक्रम राबवण्यात आला.
ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोषराव तायडे (लोणवाडीकर), प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष गोविंद वाघ, सुखदेव ब्राम्हणे, सोयस्कर सर, दिनकर वाकोडे, राजेश इंगळे, किशोर इंगळे, तोताराम वाकोडे, काशीराम सरदार, सुनील चव्हाण, प्रभाकर इंगळे, भीमराव कळसकार, मुकेश तायडे, अमोल तायडे, नितीन तायडे, सोनटक्के सर, हिवराळे सर, प्रशांत इंगळे आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजकांनी सांगितले की, “केवळ हार-तुरे घालून नव्हे तर शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली आहे.” हा कार्यक्रम नांदुरा परिसरात ‘ज्ञानाचा जागर’ म्हणून चर्चेत राहिला. ट्रस्टने केलेला हा उपक्रम भविष्यातही समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहोचवण्याच्या दिशेने प्रेरणादायी ठरेल, असे उपस्थितांनी व्यक्त केले.











