हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

ब्रेकिंग
जिल्हा शल्य चिकित्सक झोपला की काय? नियम पायदळकाँग्रेस-वंचित युती भाजपच्या पथ्यावर? दोन्हीनिष्ठावंत कार्यकर्ते अमोल अंधारे यांची पक्षएस.टी. महामंडळ कर्मचारी ग्रुप आणि समता फाउंडेठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवी कार्यककेला हिंदी हायस्कूलचा मनमानी कारभार, गल्लीती

ओमसाई फाउंडेशनने गेल्या वर्षी ८० हून अधिक अपघातग्रस्तांना वाचवले; नांदुराच्या सेवाभावी संघटनेचे कार्य कौतुकास्पद

On: April 13, 2026 4:42 PM
Follow Us:

खामगाव (प्रतिनिधी): रुग्णसेवेला समाजसेवेची जोड देत गेल्या ११ वर्षांपासून ओमसाई बहुउद्देशीय फाउंडेशन, नांदुरा येथील विलास निंबोळकर यांच्या नेतृत्वात एक टीम दिवस-रात्र अथक काम करत आहे. त्यांचे हे कार्य केवळ वाखाण्याजोगे नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. एक छोटेसे रोपटे लावून सुरू केलेल्या या उपक्रमाने आज मोठ्या वटवृक्षाचे रूप घेतले आहे.

१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या वर्षभरात फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी खामगाव, मोताळा, जळगाव जामोद आणि मलकापूर या रस्त्यांवर झालेल्या विविध रस्ता अपघातांमध्ये सापडलेल्या ८० हून अधिक जखमी रुग्णांना तातडीने मदत केली. रुग्णवाहिकेद्वारे त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले आणि तेथे भरती करून उपचार सुरू केले. वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचले, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर यांनी दिली.

काही घटनांमध्ये त्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. नायगावजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या बायोडिझेल पंपाच्या टाकीत पडलेल्या तिघांना वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यात एकाचा जीव वाचला, मात्र दोघांना वाचवता आले नाही. त्याचप्रमाणे वडनेरभोलजी गावाजवळ रस्त्यालगतच्या पडक्या विहिरीत कारसह पडलेल्या एका दांपत्याचे मृतदेह बाहेर काढण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्णा नदीत बुडालेल्या नऊ व्यक्तींचे मृतदेह पाण्यातून शोधून बाहेर काढण्याचे कामही त्यांनी धोक्यात घालून पूर्ण केले.

पूर्णा नदीवरील गणपती आणि दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी पुलावर जीवनरक्षक टीम रुग्णवाहिकेसह सज्ज राहते. ही सेवा गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. जनावरांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्येही फाउंडेशनने सक्रिय सहभाग घेतला आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी टीम जागोजागी मोफत औषधे आणि आरोग्य सुविधा पुरवते. कोरोनाकाळातही त्यांनी अंत्यसंस्काराचे काम थांबवले नव्हते.

फाउंडेशनने अनोळखी व्यक्तींच्या अंत्यसंस्काराकडेही विशेष लक्ष दिले आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात ११ अनोळखी इसमांचा आणि १ जानेवारी २०२६ ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत ३ अनोळखी व्यक्तींचा सन्मानाने दफनविधी करण्यात आला. हे सर्व त्या-त्या गावातील स्मशानभूमीत पार पडले.

विलास निंबोळकर यांनी सांगितले की, “सामाजिक ऋण फेडण्यासाठी मी मनात खूणगाठ बांधली होती. सहकाऱ्यांसोबत मिळून जेवढी मदत होईल तेवढी करत आहोत. पुढेही हे कार्य अविरत चालू ठेवणार आहोत.” फाउंडेशन कोणाकडे आर्थिक मदतीची याचना करत नाही. जे लोक स्वतःहून पुढे येऊन मदत करतात, त्यांच्या भरोशावर रुग्णवाहिका आणि इतर सेवा सुरळीत चालू आहेत.

या कार्यात विलास निंबोळकर यांच्यासोबत कमलेश बोके, किरण इंगळे, अश्विन फेरण, कृष्णा वसोकार, श्याम जुमडे, आनंदा वावगे, प्रवीण पारखेडे, विष्णू धांडे, राहुल निमकर्डे, गजानन भुसारी, नितीन ठाकरे, श्रीराम निंबोळकर, सुभाष पिवळटकर आणि प्रवीण टवंगे यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

अशा सेवाभावी कार्यामुळे ओमसाई फाउंडेशन नांदुरा परिसरात आदर्श ठरले आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment