खामगाव शहर पोलीस स्टेशनसमोर नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाच्या बांधकामादरम्यान एका तरुण कामगाराचा जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुख्याधिकारी, ठेकेदार आणि महावितरण यांच्या कथित दुर्लक्षामुळे कामगाराची जीव गमावला, अशी परिसरात चर्चा रंगली आहे.
खदान परिसरातील रहिवासी समीर बाला हा अत्यंत गरीब कुटुंबातील मेहनती तरुण होता. काम करत असताना त्याला विजेचा धक्का बसला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. समीरसोबत त्याचा मोठा भाऊ सोपानही त्याच कामावर होता, परंतु घटनेच्या दिवशी सोपान काही कामानिमित्त सुट्टीवर घरी गेला होता. सोपान उपस्थित असता कदाचित भावाला वाचवण्याचा प्रयत्न करता आला असता, असे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.
या बांधकामाचा ठेका खामगाव नगरपरिषदेकडून स्थानिक एका बांधकाम व्यावसायिकाला देण्यात आला होता. कामाचे दैनंदिन व्यवस्थापन आणि मजुरांची नेमणूक याचे सर्व अधिकार ठेकेदाराच्या नातेवाईक मनोज यांच्याकडे होते. अरशद या माध्यमातून समीरला कामावर घेण्यात आले होते. मनोज यांच्याकडून “मोदीच्या राज्यातही माझे कुणी काही करू शकत नाही, पोलीस माझ्या खिश्यात आहेत” अशा प्रकारची वल्गना केली जात असल्याची परिसरात चर्चा आहे.
वास्तविक, बांधकामाच्या ठिकाणी जिवंत विद्युत तारा होत्या. अशा ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) कडून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन तारा सुरक्षितपणे हटवल्याशिवाय कामाला परवानगी देणे आवश्यक असते. तरीही तसा कोणताही उपाय न करता थेट बांधकाम सुरू करण्यात आल्याचे दिसते. यामुळे प्रथमदर्शनी खामगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शेळके यांची जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे.
ठेकेदाराकडून खर्च वाचवण्यासाठी तारा न हटवता काम सुरू केल्यास त्यांचीही जबाबदारी निश्चित आहे. महावितरण विभागानेही या कामाकडे योग्य लक्ष देणे गरजेचे होते.
या घटनेमुळे समीरच्या गरीब कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनाने आता उपासमारीची वेळ आली आहे. परिसरातील नागरिक दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
अपघात टाळण्यासाठी काम सुरू करण्यापूर्वी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषी व्यक्तींवर योग्य कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











