बुलडाणा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीच्या पूर्वसंधेला बुलडाणा बसस्थानकावर एक अनोखा आणि भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. १३ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता माता भिमाई आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दीप, धूप, अगरबत्ती, फटाक्यांच्या आतिशबाजी आणि जयघोषासह पेढे वाटप करत मोठ्या उत्साहाने अभिवादन करण्यात आले.
समाजसेवक आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी माता भिमाईचा आदर व्हावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला. माता भिमाईच्या पोटी येणारा युगपुरुष बाबासाहेब यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंधेला त्यांच्या जन्मदात्री मातेचाही सन्मान व्हावा, ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली. उपस्थितांनी त्रिशरण पंचशील घेऊन माता भिमाई व डॉ. बाबासाहेब यांना मनोभावे वंदन केले.
यावेळी बसस्थानकावरील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला घालण्यात आल्या. स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंग राजपूत, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्रजी काळे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुभाष लहाणे, स्थानकप्रमुख कृष्णाजी पवार, समाजभूषण प्रा. इंजि. भैयासाहेब पाटील, इंजि. भास्करराव जाधव, इंजि. अशोक भोसले, प्रा. एस. पी. हिवाळे, डॉ. मंजूताई गौतम राजेजाधव, वैशालीताई रणजितसिंग राजपूत, लक्ष्मीताई बंड, निरंजन जाधव, रामराव शिंदे पाटील, गजानन माने, समाधान चिंचोले, विलास खंडेराव, राजेंद्र पवार, गणेश झोटे, सुरेंद्र भालेराव, शेख लतीफ, संजय उबरहंडे, केशव सरकटे, नबाब मिर्झा बेग, संजयजी चितळे, दत्तामामा जाधव, हर्षदिप सोनपसारे आदींसह बसस्थानकावरील पत्रकार, प्रवासी आणि महापुरुषांच्या विचारांवर चालणारा मोठा वर्ग उपस्थित होता.
आयोजक पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अलौकिक कार्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेबांनी विवेकवादी आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचे महान कार्य केले. गुलामीच्या बेड्यात जखडलेल्या बहुसंख्य समाजाला त्यांनी शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या बळावर मुक्तीचा मार्ग दाखवला. संविधानात समानतेचा अधिकार देऊन त्यांनी स्त्री-पुरुष समानता आणि सर्व जाती-धर्मातील व्यक्तींना न्याय दिला. आपण जो श्वास घेतो, स्वाभिमानाने जगतो, ते सर्व बाबासाहेबांच्या देणगीमुळे शक्य झाले आहे.”
त्यांनी बसस्थानकावर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यासाठी केलेल्या संघर्षाचीही आठवण करून दिली. तत्कालीन व्यवस्थापकांकडून आलेल्या निलंबनाला न घाबरता संविधानाच्या मार्गाने लढा दिल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन जाधव यांनी केले. शरण गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम बुलडाण्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करून गेला










