अध्यक्षीय भाषणात डॉ. गोपाल वरुटकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, “डॉ. बाबासाहेबांनी केवळ भारतीय संविधानाची रचना केली नाही, तर समाजातील वंचित आणि शोषित घटकांसाठी आयुष्यभर लढा दिला. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्यांच्या त्रिसूत्रीचा प्रत्येक विद्यार्थ्याने अवलंब करावा.” त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक समता जपत प्रगतीचा मार्ग निवडण्याचे आवाहन केले. आजच्या काळात बाबासाहेबांचे विचार अधिक प्रासंगिक असल्याचे सांगत तरुण पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. नरेंद्र पाटील यांनी डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक योगदानावर सखोल प्रकाश टाकला. “डॉ. आंबेडकर केवळ संविधान निर्माते नव्हते, तर दूरदृष्टी असलेले अर्थतज्ज्ञही होते. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे धोरणात्मक विचार मांडले,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करून स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनावे, तसेच सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेकडे वळावे, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नीरज आत्राम यांनी केले. सूत्रसंचालन खुशाल शेरकी यांनी केले तर आभारप्रदर्शन अक्षरा बावणे हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यात प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांचे विशेष योगदान होते.
महाविद्यालयातील शिक्षकवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.












