मुंबई ( प्रतिनिधी): महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त (२०२६-२०२७) सार्थक साहित्य प्रकाशनतर्फे तयार होत असलेल्या “क्रांतीसूर्याचं देणं” या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी कविता पाठविण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
राज्यभरातील कवी-लेखकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि अनेकांच्या विनंतीनुसार, कविता पाठविण्याची अंतिम मुदत आता २४ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काव्यप्रकल्पात समता, सामाजिक न्याय, मानवता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवनकार्य, त्यांचे मौलिक विचार, विविध सत्याग्रह आणि विशेषतः महाड चवदार तळ्याची क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न, विचारप्रवर्तक आणि मानवतावादी कविता अपेक्षित आहेत.
संग्रहासाठी प्राप्त होणाऱ्या कवितांमधून केवळ निवडक आणि उच्च दर्जाच्या कवितांचीच निवड केली जाणार आहे. कविता स्वतःची, पूर्णतः मौलिक आणि पूर्वी कुठेही प्रकाशित नसावी हे बंधनकारक आहे. प्रथम सहभाग नोंदवणाऱ्या कवींना प्राधान्य दिले जाईल.
इच्छुक कवींनी आपल्या कविता पाठवण्यापूर्वी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) किंवा साहित्यिक नवनाथ रणखांबे यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक : ९९६७४३५०३२ / ९९६७४८०९३२.
या प्रकल्पाद्वारे महाड सत्याग्रहाच्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देण्यासोबतच सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांना काव्यातून बळ मिळेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. राज्यातील कवींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)













