खामगाव (अजयसिंह राजपूत): तालुक्यातील हिंगणा परिसरात सध्या पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच धुमाकूळ घातला असून, या कुत्र्याच्या हल्ल्यात आतापर्यंत ३ ते ४ जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले असून, ग्रामस्थांमध्ये स्वतःच्या आणि जनावरांच्या सुरक्षेबाबत मोठी भीती निर्माण झाली आहे.
खामगाव तालुक्यातील हिंगणा गावात सध्या भीतीचे प्रचंड वातावरण पसरले आहे. एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील अनेक जनावरांना चावा घेतल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ दहशतीत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेली जनावरे आता पिसाळलेल्या अवस्थेत असून, एका गोऱ्हाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील ३ ते ४ पाळीव जनावरांना लक्ष केले. यामध्ये हरिभाऊ घोंगे यांचा बैल आणि अर्जुन घोंगे यांची वासरी यांचा समावेश आहे. कुत्र्याने घेतलेल्या चाव्यामुळे बक्षीराम सिरसाठ यांचा गोऱ्हा दगावला असल्याची माहिती मिळाली आहे. जनावरे पिसाळलेल्या अवस्थेत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
बैंक ऑफ बड़ौदा से तुरंत पाएं ₹50,000 से ₹10 लाख तक का लोन, जानिए पूरी प्रक्रिया
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील पाळीव जनावरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या कुत्र्याने गायी, वासरे आणि इतर जनावरांना लक्ष्य केले असून, त्याच्या चाव्यामुळे जनावरे पिसाळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. जखमी जनावरांच्या अंगावर खोलवर जखमा झाल्या असून, त्यांच्यावर उपचार करताना पशुपालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
जनावरांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिसाळलेले कुत्रं आता मानवावरही हल्ला करू शकतं, या भीतीने ग्रामस्थ घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. विशेषतः लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी तर गावात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
प्रशासनाकडे मागणी
या गंभीर प्रकाराची दखल घेऊन संबंधित विभागाने तात्काळ या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी हिंगणावासीयांकडून होत आहे. तसेच, जखमी झालेल्या जनावरांना तात्काळ पशुवैद्यकीय मदत मिळावी आणि रेबीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी आर्त हाक ग्रामस्थांनी दिली आहे.






