बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव राजा परिसरात उघडकीस आलेल्या गांजा प्रकरणाने मोठी खळबळ माजवली आहे. सकाळी आठ वाजता कारवाई सुरू झाल्यानंतरही बारा तास उलटून गेले तरी अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने स्थानिक नागरिक आणि पत्रकारांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय मुंढे यांनी सकाळी आठच्या सुमारास पत्रकार मोहसीन यांच्यासह खाजगी वाहनाने गोडाऊनवर छापा टाकला. गोडाऊनमध्ये चाळीस ते पन्नास तांदळाचे कट्टे होते. मुंढे सरळ त्यातील एका विशिष्ट कट्ट्याकडे गेले आणि त्यात गांजा असल्याचे आढळले. या कट्ट्यात गांजा असल्याची माहिती मुंढे यांना कशी मिळाली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
घटना सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान घडल्याने घटनास्थळी शेकडो पत्रकार दाखल झाले. मात्र, एपीआय मुंढे यांचा दिवसभर काहीच पत्ता नव्हता. इतक्या गंभीर प्रकरणात तपास अधिकारी स्वतः गायब असल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. संध्याकाळी ते घटनास्थळी हजर झाल्यावर पत्रकारांनी माहिती विचारली, पण मुंढे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दिवसभर उन्हात थांबलेल्या पत्रकारांशी झालेल्या वागणुकीमुळे पोलीस प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आल्याचे चित्र आहे.
या प्रकरणात नियोजनबद्ध पद्धतीने काहीतरी शिजवले जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सकाळी कारवाई सुरू झाल्यापासून बारा तास उलटूनही गुन्हा नोंदवला न गेल्याने प्रकरण बनवाबनवीचे तर नाही ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक गावकऱ्यांसह पत्रकार बांधवांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करावी, प्रकरणाचा खरा उलगडा करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलीस विभागावरील जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी “दूध का दूध आणि पाणी का पाणी” असे करणे गरजेचे आहे.










