पारस : पारस विज केंद्राच्या अधिकारक्षेत्रातील एफजीडी प्रकल्पात मे. अभि इंजिनिअरिंग कंपनीच्या वाहन चालकांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला यश आले आहे. मागण्या मान्य न झाल्याने आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते, मात्र कंपनी व्यवस्थापनाने आंदोलन स्थळी धाव घेऊन कामगारांच्या मागण्या मान्य केल्या.
महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेच्या लढाऊ बाण्यामुळे प्रविण वानखडे आणि आशीष सोनोने या दोन आंदोलकांना न्याय मिळाला. दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी त्यांचे थकीत वेतन व अंतीम पगार देण्यात आल्याने आंदोलकांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.
संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष भाई जी. एम. भालेराव यांच्या नेतृत्वाखाली प्रविण वानखडे व आशीष सोनोने यांनी ८ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान साखळी उपोषण केले होते. न्याय न मिळाल्याने १२ एप्रिलपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले. चौथ्या दिवशी म्हणजे १३ एप्रिल रोजी कंपनी व्यवस्थापन व संबंधित प्रशासनाने दखल घेत थकीत वेतनासह अंतीम पगार अदा केला.
आंदोलन यशस्वी झाल्याने पारस विज प्रकल्पातील कामगारांसह विज केंद्रातील इतर कामगार आणि गावातील नागरिकांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. प्रविण वानखडे व आशीष सोनोने यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, “रोजंदारी मजदूर सेनेने जीद्द, धैर्य आणि धाडसाने आम्हाला साथ दिली आणि आमचा न्याय मिळवून दिला. संघटनेचे मन:पूर्वक आभार.”
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई ललीत खंडारे, उपाध्यक्ष भाई राजू इंगळे, भाई संजू कापडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. तसेच प्रखर उन्हात आंदोलकांसाठी कुलरची व्यवस्था करणारे ज्येष्ठ फोटोग्राफर प्रकाशभाऊ खंडारे यांचे विशेष सहकार्य लाभले.
विविध संघटनांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. तमाम कामगार बांधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन मंडपात भेट देऊन यशस्वीतेस हातभार लावला.
भाई जी. एम. भालेराव यांच्या नेतृत्वाखालील या लढ्याने रोजंदारी कामगारांच्या हक्कासाठी संघटनेची ताकद पुन्हा एकदा दाखवली आहे.
(प्रखर प्रहार न्यूज नेटवर्क)












